सणासुदीत दिलासा! ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, पीठ आणि कांदा आता परवडणाऱ्या दरात
.png)
-नाफेडच्या माध्यमातून फिरत्या व्हॅनना हिरवा झेंडा पणन मंत्री जयकुमार रावल यांचा शुभारंभ
मुंबई : सणासुदीच्या काळात महागाईने होरपळलेल्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा दिलासा. ‘भारत’ ब्रँडचे तांदूळ, गव्हाचे पीठ आणि कांदा आता बाजारभावापेक्षा कमी दरात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे याचा तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला.
नाफेडच्या माध्यमातून विक्रीसाठी आलेल्या फिरत्या वाहनांना मंत्री रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. या उपक्रमांतर्गत ‘भारत आटा’ 31.50 रुपये किलो, ‘भारत तांदूळ’ 34 रुपये किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे. तर कांदाही कमी दरात ग्राहकांसाठी विक्रीला ठेवण्यात आला आहे.
राज्यातील सहकारी ग्राहक भांडार, रिलायन्स रिटेल, डी-मार्ट, विशाल मार्ट तसेच आघाडीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहतील. ग्राहकांच्या सोयीसाठी मोबाईल व्हॅनद्वारे थेट घरपोच सेवा दिली जाणार असल्याची माहिती नाफेडच्या राज्य प्रमुख भव्या आनंद यांनी दिली.
“या उपक्रमामुळे बाजारात स्पर्धा वाढून महागाई आटोक्यात येण्यास मदत होईल. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होत आहेत,” असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.