मुंबईतून नवी मुंबईला पोहोचणं झालं सोपं, 6 पदरी पूलामुळे अडीच लाख वाहनचालकांना होणार फायदा!

-नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या ठाणे पूल क्रमांक 3 चे काम पूर्ण झालंय.
मुंबईतून नवी मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण दोन्ही शहरांतील अंतर आता कमी होणार आहे. या मार्गावरील 6 पदरी पूल सुरु झालाय. यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला दिलासा मिळणार आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात आलेल्या दोन नवीन उड्डाणपुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे जाणाऱ्या ठाणे पूल क्रमांक 3 चे काम पूर्ण झालंय. या पुलाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या पुलाच्या वापरामुळे वाशी ते मानखुर्द दरम्यानचा प्रवास अधिक गतीमान आणि सुरळीत होणार आहे. उद्घाटनानंतर लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने   2 समांतर पुलांची संकल्पना राबवली. यातील पहिला मानखुर्दहून वाशीकडे जाणारा पूल ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात आला होता. तर दुसरा वाशीकडून मानखुर्दकडे जाणारा पूल आता वापरासाठी खुला होणार आहे.
या पूलाची एकूण लांबी 1837 मीटर आहे. मुंबईकडील पोहोच मार्ग 380 मीटर आहे. मार्गिका (लेन्स)     प्रत्येकी 3 लेन्सचे 2 पूल अशा ६ मार्गिका आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 559 कोटी रुपये खर्त आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली.
नव्या पूलमुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (NMIA) जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे वाशी ते विमानतळादरम्यानचा प्रवास आता 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे. यामुळे व्यापार, पर्यटन आणि व्यावसायिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पूलावरुन दररोज सुमारे अडीच लाख वाहने येजा करतात. यासाठी 30 मिनिटे इतका सरासरी प्रवास वेळ लागतो. हा वेळ आता 10-15 मिनिटांवर येणार आहे. यामुळे दरमहा अंदाजे ₹8 कोटी रुपयांची इंधन बचत होणार आहे. उत्सर्जनात घट होऊन रोजची सुमारे 12 टन CO₂ बचत होईल. NMIA कनेक्टिव्हिटी दिल्याने रोजचा 15 ते 20 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
या विकासात्मक प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबईमधील दळणवळण अधिक गतिमान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक झालंय. भविष्यातील वाहतूक आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने हा खाडी पूल एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.