शक्ती’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा?; 3 ते 7 ऑक्टोबरदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई :महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ट्रॉपिकल सायक्लोन अॅडव्हायजरी क्रमांक ०३ जारी करत राज्याच्या किनारपट्टी भागात ‘शक्ती’ चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. हा इशारा ३ ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना धोका संभवतो.
वाऱ्याचा इशारा
३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. झंझावाती वाऱ्यांचा वेग ६५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. चक्रीवादळाची तीव्रता वाढल्यास हा वेग आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
समुद्र स्थिती
५ ऑक्टोबरपर्यंत समुद्र अतिशय खवळलेला राहणार असून मच्छिमारांनी या काळात समुद्रात न जाण्याचे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पाऊस व पूरस्थिती
चक्रीवादळामुळे कोकण, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारलेली नाही.
प्रशासनाची तयारी
राज्य शासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले असून, किनारपट्टी व सखल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी योजना तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.