राज्यात उद्या पासून तुर खरेदी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार - पणन मंत्री जयकुमार रावल

तूर खरेदी प्रक्रियेत अडचण येणार नाही याची काळजी घेवून नियोजन करावे,पणन मंत्री जयकुमार रावल यांनी संबधिताना दिले निर्देश
हमी भावाने 300 केंद्रावरून तीन लाख मेट्रीक टन तुर खरेदी करण्यात येणार आहे
मुबंई – राज्यातील शेतक-यांकडून तूर खरेदी करण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया उद्या (दि.२४ जानेवारी) पासून सुरु करण्यात येणार आहे. तुवर खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांना त्याचे पेमेंट कसे मिळेल याची प्रक्रिया जलदगतीने करावी.तसेच नोंदणी प्रक्रिया तांत्रिक अडचण न येता कशी होईल याची काळजी घ्यावी.असे निर्देश राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिले. तसेच हमी भावाने 300 केंद्रावरून तीन लाख मेट्रीक टन तुर खरेदी करण्यात येणार आहे. अशी माहिती ही त्यांनी वेळी दिली.
आज सह्याद्री अतिथीगृह येथे तूर खरेदी प्रक्रिये संदर्भातील आढावा बैठक झाली त्यात मंत्री जयकुमार रावल बोलत होते. बैठकीस एन.डी.श्रीधर दुबे पाटील कार्यकारी संचालक ( मार्फेड), भाव्या आनंद, राज्यप्रमुख (नाफेड),प्रशांत बसवकर,उप व्यस्थापक,एमएसडब्लुसी, डी.आर.भोकरे, व्यवस्थापक(मार्फेड) यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.नाफेड अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन तसेच विर्दभ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थाच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
जयकुमार रावल पुढे म्हणाले की, राज्यभरात सुरवातीला तीनशे खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार आहे. या साठी विनाअडथळा शेतक-यांना तूर खरेदी नोंदणीची तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून त्यात तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी यंत्रणेने घ्यावी. वेअर हाऊसिंग कार्पोरेशनने खरेदी प्रक्रियेतील आपले काम जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना पेमेंट जमा करण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. या कामी अधिकचे मनुष्यबळ लागत असल्यास त्याची व्यवस्था करावी. त्याचसोबत खरेदी केंद्रांवर शेतक-यांना पाण्याची,बसण्याची सुयोग्य व्यवस्था, तक्रार निवारण केंद्र निर्माण करावे. याठिकाणी शेतक-यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी. जिल्हा मार्कैटिंग अधिकारी यांनी या सर्व बाबींचे नियंत्रण करुन तक्रारींचे निवारण करावे. तूर खरेदी च्या दृष्टीने वेअर हाऊसची नियोजन व्यवस्था तयार ठेवावी. त्यासाठीची आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात यावी. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतक-यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात यावी. शेतक-यांनी डेटा एन्ट्री केल्या नंतर पुढच्या ७२ तासात नाफेड मार्फत नियमानुसार त्यांना पैसे प्राप्त होतील, याची काळजी नाफेडने घ्यावी. खरेदी नोंदणीची तसेच खरेदी सुरु झाल्यानंतर त्या बाबतची प्रक्रिया गतीने सुव्यवस्थितरत्या पार पाडण्याच्या सूचना यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी संबंधिताना दिल्या.